किवळे,दि.०७ जुलै २०२६(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-किवळे परिसरात महावितरणाच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पावसाळ्यापूर्वी सतर्कतेच्या आणि देखभाल कामांच्या नावाखाली विविध दावे करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात पावसाने दमदार हजेरी लावताच हे सर्व दावे हवेत विरल्याचे चित्र दिसत आहे.
गेल्या एप्रिल महिन्यापासून परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. पावसाळ्यापूर्वी खबरदारीची कामे सुरू असल्याचे सांगण्यात आले होते, त्यामुळे नागरिकांनी संयमही ठेवला. परंतु आता परिस्थिती पाहता “लांडगा आला रे आला” या म्हणीचीच आठवण होत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.
विशेष म्हणजे तब्बल २४ तास उलटूनही अनेक भागांमध्ये वीजपुरवठा सुरळीत झालेला नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. त्यामुळे महावितरणाच्या नियोजनावर आणि कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. जर पावसाळ्यापूर्वीची तयारी खरंच झाली असेल, तर पहिल्याच जोरदार पावसात व्यवस्थेचे तीनतेरा का वाजले, असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर महावितरणाचे कर्मचारी आणि अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता अनेक वेळा फोनलाही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप होत आहे. मात्र दुसरीकडे वीज बिल भरण्यास उशीर झाला तर वीजपुरवठा खंडित करण्यासाठी तत्परता दाखवली जाते, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे. “जेव्हा नागरिक अडचणीत असतात, तेव्हा ही तत्परता नेमकी कुठे जाते?” असा प्रश्न आता नागरिकांकडून विचारला जात आहे.
वरपासून खालपर्यंत संपूर्ण यंत्रणेत ढिसाळ कारभार सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला असून, या सततच्या त्रासामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना वाढत आहे. परिस्थिती अधिक चिघळू नये आणि नागरिकांनी कायदा हातात घेण्याची वेळ येऊ नये, यासाठी प्रशासनाने तातडीने लक्ष घालून ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आता जोर धरत आहे.





