पिंपरी-चिंचवड,दि.२३ जुन २०२६(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- भिमशाही युवा संघटना (महाराष्ट्र राज्य) संस्थापक/अध्यक्ष शिवशंकर उबाळे यांच्या वतीने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण अधिकारी व उपआयुक्त व महापौर यांना निवेदन देण्यात आले कमलेश वाळके,प्रदीप वाकोडे,साहेबराव ओव्हाळ, मनीषा धनगावकर यावेळी उपस्थित होते. संबंधित निवेदनात शहरातील काही शाळांकडून आरटीई (Right to Education) अंतर्गत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना मानसिक त्रास दिला जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
संघटनेच्या म्हणण्यानुसार, टेल्को परिसरातील विद्यानिकेतन शाळेमध्ये इयत्ता पाचवी व आठवीच्या सुमारे 20 ते 25 आरटीई विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक नापास करण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांना “आपल्या विद्यार्थ्यांना शाळेतून काढून दुसऱ्या शाळेत प्रवेश द्यावा” असे सांगण्यात येत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या प्रकारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता असून, शाळेची तातडीने चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भिमशाही युवा संघटनेकडून करण्यात आली आहे.
यासंदर्भात कारवाई न झाल्यास विद्यार्थी व पालकांना सोबत घेऊन विद्यानिकेतन शाळेसमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. तसेच आवश्यक असल्यास शिक्षण विभाग कार्यालयासमोरही आंदोलन छेडण्यात येईल, असे संघटनेच्या निवेदनात म्हटले आहे.





