देहुरोड,दि.१४ जुलै २०२६(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-देहूरोड पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस उपनिरीक्षकाला (PSI) कथितपणे अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळासह पोलिस विभागातही रंगू लागली आहे. या घडामोडींमुळे “कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनाच लक्ष्य केले जात आहे का?”, तसेच “पोलिस प्रशासनाचा धाक कमी होत चालला आहे का?” असा प्रश्न उपस्थित होत आहे.
विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित अधिकारी कायद्याच्या चौकटीत राहून कर्तव्य बजावत असल्याने काही घटकांकडून त्यांच्यावर विविध प्रकारे दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. या चर्चेची अधिकृत पुष्टी झालेली नसली, तरी त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
पोलिस हे कोणत्याही राजकीय पक्षाचे नसून कायद्याचे रक्षक आहेत. त्यामुळे एखादा अधिकारी निष्पक्षपणे कारवाई करत असेल आणि त्याच वेळी त्याला वादात ओढण्याचा किंवा बदनाम करण्याचा प्रयत्न होत असेल, तर त्याचे गंभीर परिणाम संपूर्ण पोलिस दलाच्या मनोबलावर होऊ शकतात, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
लोकशाही व्यवस्थेत प्रत्येकाला तक्रार करण्याचा अधिकार आहे. मात्र, तक्रारींचा वापर जर वैयक्तिक किंवा राजकीय सुडासाठी होत असेल, तर त्याची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे. सत्य काहीही असो, ते पारदर्शकपणे जनतेसमोर येणे हीच लोकशाहीची अपेक्षा आहे.
देहूरोड परिसरात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असून, नेमके काय घडले? कोण कोणाविरुद्ध भूमिका घेत आहे? आणि या संपूर्ण प्रकरणामागील सत्य काय आहे? याबाबत विविध स्तरांवर तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत.
प्रजेचा विकासचा सवाल…
कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांनाच जर लक्ष्य केले जात असेल, तर उद्या कायद्याची निष्पक्ष अंमलबजावणी कोणत्या वातावरणात होणार? राजकीय प्रभावापेक्षा कायद्याचे राज्य मोठे की नाही, याचे उत्तर आता संबंधित यंत्रणेलाच द्यावे लागणार आहे.





