Home ताज्या बातम्या भारतीय राजदूतांशी पंतप्रधानांनी साधला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद

भारतीय राजदूतांशी पंतप्रधानांनी साधला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद

91
0

नवी दिल्ली, 29 मार्च 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनीधी):-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संध्याकाळी 5 वाजता भारताच्या राजदूत आणि महावाणिज्य दूतांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. जगभरातील राजदूत आणि महावाणिज्य दूतांशी अशाप्रकारे प्रथमच संवाद साधल्या गेला.

कोविड-19च्या जागतिक परिस्थितीची चर्चा करण्यासाठी या संवादाचे आयोजन करण्यात आले होते.

पंतप्रधान म्हणाले की, कसोटीच्या वेळी समस्यांवर तशाच प्रकारचा तोडगा काढणं आवश्यक असतं, त्यामुळेच आजच्या जागतिकीकरणाच्या युगातही कोविड-19चा सामना करण्यासाठी संपूर्ण जगानं स्वतःचं विलगीकरण केलं आहे. या जागतिक साथीच्या आजाराचा सामना करण्यासाठी हे अपरिहार्य पाउल होतं. मात्र, त्याचे परिणामही मोठे होणार आहेत. कारण, आजच्या जागतिकीकरणाच्या व्यवस्थेत या निर्णयाचे आंतरराष्ट्रीय वाहतूक व्यवस्था, वित्तीय बाजारपेठा आणि एकूणच जागतिक अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होणार आहेत. या जागतिक आजारावर मात करण्यासाठी भारतानं जानेवारीच्या मध्यापासूनच अभूतपूर्व उपाययोजना सुरु केल्या आहेत. भारतात हा संसर्ग येण्याचा धोका जितका कमी करता येईल तितका करण्यासाठी सुरवातीपासूनच पावले उचलली आणि नंतर त्याचा उद्रेक रोखण्यासाठी काम सुरु केलं आहे. याचाच भाग म्हणून भारतात जगातील सर्वात मोठे विलगीकरण आणि लॉकडाऊन करण्यात येत आहे.

विविध देशांमध्ये आणि काही ठिकाणी तर या आजाराचे केंद्र बिंदू असलेल्या प्रदेशात अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी त्या देशांमधल्या राजदुतांनी केलेल्या प्रयत्नांचं पंतप्रधानांनी कौतुक केलं. आणखी पाच विषयांबाबत काही पावलं उचलण्याची सूचना त्यांनी राजदूतांना दिली.

  1. त्यांची स्वतःची प्रकृती आणि सुरक्षिततेची काळजी घ्यावी. तसेच आपली टीम आणि कुटुंबियांचीही काळजी घ्यावी.
  2.  अंतरराष्ट्रीय प्रवासावर असलेले निर्बंध संपण्याबाबत अनिश्चीचितता असण्याच्या काळात परदेशात विविध ठिकाणी अडकून पडलेल्या भारतीयांची काळजी घ्यावी. अशा भारतीय नागरिकांचं मनोधैर्य वाढविण्यासाठी मदत करावी. त्यांच्या विदेशातील अनियोजित वास्तव्याच्या काळात त्यांना येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा. संबंधित सरकारांशी संपर्क साधून त्यांच्या निवासाची आणि इतर सोय करावी.
  3. भारत कोरोना विरुद्ध लढा देत असताना परदेशात या संदर्भात पाळल्या जात असलेल्या पद्धती, संशोधन, वैज्ञानिक शोध अथवा या आजाराचा सामना करण्यासाठी वैद्यकीय साधनांचा पुरवठा या बाबत जागरूक राहून वेळोवेळी याची माहिती घ्यावी आणि भारतापर्यंत त्याचा लाभ पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावा. PM-CARES या नव्या निधी संकलन उपक्रमाची जाहिरात करून त्यासाठी परदेशातून देणग्या मिळविण्याचा प्रयत्न करावा.
  4. या संकटाचा मोठा परिणाम अर्थव्यवस्थेवरही होणार असून भारतात येणाऱ्या अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा, लॉजीस्टिक साखळ्या, परदेशातून येणारा पैसा, इत्यादीवर परिणाम होऊ नये या साठी प्रयत्न करावे संबंधित राष्ट्रांशी समन्वय ठेऊन त्यावर काम करावे.कोविड-19 या जागतिक साथीच्या आजाराच्या संदर्भाने अंतरराष्ट्रीय राजकारण आणि आर्थिक परिस्थिती यात वेळोवेळी होत असलेल्या बदलांकडे बारकाईने लक्ष ठेवावे.
  5. या संवादात सहभागी झालेल्या बीजिंग, वाशिंग्टन डीसी, तेहरान, रोम, बर्लिन, काठमांडू, अबुधाबी, काबुल, माले, आणि सेऊल इथल्या राजदुतांनी आपापले विचार पंतप्रधानांसमोर मांडले. या आजाराचा सामना करण्यासाठी भारत करत असलेल्या प्रयत्नांबाबत इतर देशांनी समाधान व्यक्त केलं असल्याचंही त्यांनी सांगितलं.परदेशात अडकलेले भारतीय विशेषतः विद्यार्थी आणि कामगार यांना मदत करण्यासाठी दूतावास करत असलेल्या प्रयत्नांची माहिती त्यांनी यावेळी दिली. या आजाराचा सामना करण्यासाठी भारताच्या कामी येऊ शकतील अशी औषधे, वैद्यकीय उपकरणे, तंत्रज्ञान, संशोधन आणि इतर उपाय योजना शोधण्याचा प्रयत्न सातत्याने सुरु आहे, असंही त्यांनी सांगितलं. या आजाराचा सामना करताना संबंधित देशांकडून मिळालेला धडा आणि त्यांच्या उत्तम उपाय योजना देखील या राजदुतांनी सांगितल्या. आपल्या शेजारी देशांना मदत करण्यासाठी भारताकडून होत असलेल्या प्रयत्नांची माहिती विशेषतः सार्क देशांसाठी भारतानं सुरु केलेल्या उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. त्यांच्या कामांबाबत पंतप्रधानांकडून मिळणारं मार्गदर्शन आणि प्रेरणेबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.या बैठकीच्या शेवटी पंतप्रधान म्हणाले की भारतीय दूतावासातील सर्व टीम देशाबाहेर काम करत असली तरीही देशाच्या कोरोन विरुद्धच्या लढाईत त्यांचा पूर्ण सहभाग आहे. जगभरातल्या भारतीयांची एकता आणि सजगता यामुळेच आपण देशाचे भवितव्य सुरक्षित ठेऊ शकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Previous articleअन्न,नागरी पुरवठा विभागाकडून खुलासा? रेशनवरील धान्य खरेदीसाठी व्हायरल असलेला फॉर्म बनावट..
Next articleकोविड -19 महामारीच्या पार्श्वभूमीवर सरकारने एमजी-एनआरईजीएस वेतनात सरासरी 20 रुपये वाढ केली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

16 − eleven =