Home ताज्या बातम्या जगू आनंदे!मनाची मशागत – डॉ. दत्ता कोहिनकर

जगू आनंदे!मनाची मशागत – डॉ. दत्ता कोहिनकर

145
0

*जगू आनंदे! *मनाची मशागत-डॉ. दत्ता कोहिनकर*

माईंड पॉवर ट्रेनर
लेखक बेस्ट सेलर बुक
” (संपर्क-9822632630.,8830785150)
पुणे,दि.१ नोव्हेंबर २०१९(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-
एक काल्पनिक घटना – एका कॅनॉलवरून एक गाढव निवांत चालले होते. मागून आलेल्या एस.टी.चालकाने जोरात हॉर्न वाजवून त्याला घाबरवले. गाढव भितीने पळताना तोल जावून कॅनॉलच्या तुटलेल्या कठडयावरून पाण्यात पडले. नाकातोंडात पाणी शिरले. गाढव गटांगळया खात बुडू लागले. तेवढयात दोन पहिलवानांनी ते दृश्य पाहून कपडे काढले व पाण्यात उडया मारून गाढवाला कौशल्यपूर्ण रितीने काठावर आणून त्याच्या पोटावर दाब देऊन पोटात गेलेले पाणी तोंडाबाहेर काढले व बुडताना गाढव जोरजोराने काय ओरडत होते याची विचारणा केली, त्यावेळेस गाढव म्हणाले मित्रांनो मी गटांगळया खाताना ओरडत होतो, ‘‘दुनिया बुडाली – दुनिया बुडाली.’’ ‘म्हणजे काय ?’ याचे स्पष्टीकरण करताना गाढव म्हणाले, ‘‘साहेब, मी बुडालो म्हणजे दुनिया बुडाली’’ ‘‘सिर सलामत तो पगडी पचास’’ या म्हणीचा येथे प्रत्यय येतो म्हणून आपण संपलो की दुनिया आपल्यासाठी संपलेली असते. म्हणून जोवर आपले अस्तित्व आहे. तोवर आनंदी रहा व स्वतःवर प्रेम करा. जोवर आपण स्वतःवर प्रेम करू शकणार नाही तोपर्यंत इतरांविषयी आपल्या मनातील प्रेमाची स्पंदने उत्पन्नच होऊ शकणार नाही. ‘‘आडात नाही तर पोहर्‍यात येणार कुठून ?’’
आनंदी रहावयास शिकणे मग परिस्थिती कशी का असेना, ती एक साधनाच आहे. सर्व ऐश्‍वर्य पायाशी लोळत असताना दुःखी-कष्टी-उदास चेहरे असलेली जोडपी याउलट हातावरचे पोट असलेली सायकलवर डबलसीट जाणारी-हसतमुख जोडपी मी पाहिलेली आहे.
देवाने आपल्याला जे काही दिले आहे ते आपल्याच कर्माचे फळ आहे. मग सुख असू द्या वा दुःख असू द्या. दोन्हीही (अनित्य) बदलणारे तर आहेत म्हणून दोन्ही परिस्थितीत मन संतुलित ठेवा व आनंदाने जगा. आत्तापर्यंत जे आयुष्य गेलं ते गेलं, या क्षणापासून दिलखुलास जगा. ‘‘झाड लावायची सर्वोत्तम वेळ याक्षणीच आहे’’ ही चिनी म्हण तुम्हाला माहीत असेलच.
परवाच जाताना दुकानावर गांधी शेठ भेटले, आज सकाळी त्यांच्या निधनाची वार्ता ऐकली. हृदयविकाराने त्यांना देवाज्ञा झाली होती. मृत्यू कधी झडप टाकील – सगळं गूढच आहे. म्हणून भूतकाळ व भविष्यकाळ – सोडून वर्तमानात आनंदाने जगा. तुटलेले संबंध जोडण्यासाठी पुढे या. प्रेमाच्या माणसांसमोर आपल्या भावना व्यक्त करा. कुटूंबाबरोबर सहलीला जा. सुट्टी काढून कुटूंबाबरोबर गतकाळातील चांगल्या स्मृतींना उजाळा देऊन आपल्या लाडक्या लेकीला जवळ घ्या. आपल्या प्रिय पत्नीला पहिल्यांदा फिरायला घेऊन गेलात तेव्हा जसा तिचा हात आपल्या हातात घट्ट धरून वार्‍याने उडणार्‍या तिच्या केसांचे, बटांचे कौतुकाने निरिक्षण करत होता, त्याची पुनरावृत्ती करा. सांगा तिला मनापासून, तुमचे तिच्यावर किती प्रेम आहे ते. आपल्या आई-वडिलांच्या जवळ बसून आपल्या हाताने त्यांना गोडधोड खाऊ घाला – आज मी जे काय आहे ते तुमच्या दोघांमुळेच असे कृतज्ञतेचे शब्द उच्चारत त्यांच्या चरणाला स्पर्श करा. आपल्या कृतज्ञतेने त्यांच्या डोळयातील आनंदाश्रुंना वाट मोकळी करून द्या. आपली चित्रपट पाहण्याची, पुस्तके वाचण्याची, नाटक बघण्याची इच्छा मनसोक्त पुर्ण करून घ्या. कुटूंबाला डिजनी लँड मध्ये घेऊन जा, भरपूर नाचा, पोहण्याची मनसोक्त इच्छा पूर्ण करा, त्यांच्या आवडीचे पदार्थ त्यांना घेऊन द्या. मुलांबरोबर, नातवंडाबरोबर खेळा, बागडा, नातीगोती घट्ट करण्यासाठी पुढाकार घ्या. एखादया कलेसाठी वेडं होऊन जा त्यातला आनंद उपभोगा. सर्वत्र प्रेमाचा अविष्कार करा. हजारो मैल विनासायास प्रवास करण्याची शक्ती फक्त प्रेमातच आहे. त्याने भविष्यातील जगणंही अमर्याद होऊन जातं. रोज सकाळी उठल्यावर आरशासमोर उभे राहून आपल्या डोळयात डोळे घालून स्वतःला आय लव्ह यु ( I Love You) असे दहा वेळा म्हणा. आपल्या शरीरातील 50 ट्रिलियन पेशींना प्रेमाची स्पंदने मिळून उत्साहाची ऊर्जा अमर्याद वाढते.
जगात सगळयात महागडा बिछाना कुठला ? तर तो आजारपणाचा बिछाना होय. आपली गाडी चालवण्यासाठी चालक भाडयाने मिळतो, सेवेसाठी नोकर मिळतात. पण आपलं आजारपण सहन करण्यासाठी आपण इतर कोणालाही नेमू शकत नाही. प्रेम – निस्सीम प्रेम आजारपणाला आपल्यापासून दूर ठेवते.
हरवलेल्या वस्तू सापडू शकतात. पण एकच गोष्ट अशी आहे कि जी एकदा हातातून निसटली ती कोणत्याही उपायानं ती पुन्हा मिळू शकत नाही ते म्हणजे आपलं ‘‘आयुष्य’’. कुटूंबावर, नातलगांवर, मित्रमैत्रीणींवर, शेजार्‍या पाजार्‍यांवर मनसोक्त प्रेमाची उधळण करा.समोरून तुम्हाला प्रेमाचीच झुळूक येईन. या प्रेममय वार्‍याच्या झोतात जीवनरूपी हृदयात हिरवीगार बाग फुललेली तुम्हाला दिसेन. जीवन खुप सुंदर आहे. त्यावर खुप प्रेम करा व आनंदाने जगा.
‘‘ या जन्मावर – या जगण्यावर
शतदा प्रेम करावे – शतदा प्रेम करावे ॥’’ 🙏🌹🙏 *कुटूंबापासून दूर राहण्याची वेळ कोणावरही येऊ नये ही प्रार्थना..Youtube वर व्हिडीओ अवश्य पहा. व मनाची मशागत पुस्तक अवश्य वाचा . व आनंदाने जगा. *दिवाळीपर्यंत 270 रुपयाचे हे पुस्तक 200 रुपयात आम्ही देणार आहोत* ११ महिन्यात 17000 पुस्तके विकली गेली

Previous articleतेल्हाऱ्यात ऐन दिवाळीच्या दिवशीच फ्रिजच्या स्फोटाने मेडिकल जळून खाक
Next articleआमदार अण्णा बनसोडे यांनी जाणून घेतल्या नागरिकांच्या समस्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

eleven + fifteen =