*घराघरांत उजळणार स्वच्छतेचा दीप*
*स्वच्छता ही सेवा अभियानात नागरिकांनी सहभागी व्हावे : महापौर रवि लांडगे आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे आवाहन*
*पिंपरी, दि. १६ सप्टेंबर २०२६* : केंद्र शासनाच्या ‘स्वच्छता ही सेवा – २०२६’ अभियानांतर्गत १७ सप्टेंबर रोजी प्रत्येक नागरिकाने आपल्या घराची स्वच्छता करून सायंकाळी दिवा प्रज्वलित करावा आणि स्वच्छ, निरोगी जीवनशैलीचा संकल्प करावा, असे आवाहन महापौर रवि लांडगे आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे. प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत लाभार्थी तसेच शहरातील सर्व नागरिकांनी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
स्वच्छता ही केवळ सार्वजनिक ठिकाणांपुरती मर्यादित न राहता प्रत्येक घरातून आणि प्रत्येक कुटुंबातून सुरू व्हावी, या उद्देशाने हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. नागरिकांनी १७ सप्टेंबर रोजी घराची स्वच्छता करून सायंकाळी दिवा प्रज्वलित करावा. स्वच्छतेचा हा दीप आपल्या कुटुंबाच्या आरोग्याचा आणि स्वच्छ जीवनशैलीचा संकल्प अधिक दृढ करणारा ठरावा, असा महापालिकेचा उद्देश आहे.
महापौर रवि लांडगे म्हणाले, “स्वच्छ शहराची सुरुवात आपल्या घरापासून होते. प्रत्येक कुटुंबाने स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारली, तर त्याचा सकारात्मक परिणाम संपूर्ण शहराच्या स्वच्छतेवर होतो. त्यामुळे नागरिकांनी १७ सप्टेंबर रोजी आपल्या घराची स्वच्छता करून दिवा प्रज्वलित करावा आणि स्वच्छतेचा संकल्प करावा. या उपक्रमात पिंपरी चिंचवडकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.”
आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले, “स्वच्छता ही एका दिवसाची मोहीम नसून ती सातत्याने अंगीकारायची जीवनशैली आहे. ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांसह शहरातील प्रत्येक नागरिकाने १७ सप्टेंबरच्या उपक्रमात सहभागी होऊन स्वच्छ, निरोगी आणि सुंदर शहराच्या निर्मितीसाठी आपला सक्रिय सहभाग नोंदवावा.”
उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल म्हणाले, “घर आणि परिसर स्वच्छ ठेवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. नियमित स्वच्छतेच्या सवयींमुळे आरोग्यदायी वातावरण निर्माण होण्यास मदत होते. त्यामुळे नागरिकांनी या उपक्रमाकडे केवळ एक दिवसाचा कार्यक्रम म्हणून न पाहता स्वच्छतेची सवय कायमस्वरूपी अंगीकारावी आणि १७ सप्टेंबर रोजी आवर्जून सहभागी व्हावे.”
उप आयुक्त अण्णा बोदडे म्हणाले, “नागरिकांचा सहभाग हा स्वच्छता अभियानाचा केंद्रबिंदू आहे. प्रत्येक घरातून स्वच्छतेचा संदेश देत नागरिकांनी आपल्या घराची स्वच्छता करावी, दिवा प्रज्वलित करून स्वच्छ आणि निरोगी जीवनशैलीचा संकल्प करावा. तसेच आपल्या सहभागाची ऑनलाइन नोंद करून या अभियानाला व्यापक लोकसहभाग मिळवून द्यावा.”
*नागरिकांनी असा नोंदवावा आपला सहभाग*
उपक्रमात सहभागी झाल्यानंतर नागरिकांनी ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाच्या https://swachhatahiseva.gov.in/citizen या संकेतस्थळावर आपल्या सहभागाची ऑनलाइन नोंद करावी. त्यासाठी ‘सहभाग प्रमाणपत्र डाउनलोड करा’ हा पर्याय निवडून नाव, वय आणि लिंग आदी आवश्यक माहिती भरावी. त्यानंतर ‘स्वच्छतेतून समृद्धीकडे’ हा उपक्रम प्रकार निवडून घराच्या स्वच्छतेनंतरचे छायाचित्र अपलोड करावे. छायाचित्र अपलोड केल्यानंतर नागरिकांना सहभागाचे प्रमाणपत्र मिळणार आहे.
नागरिकांनी १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेपर्यंत घराची स्वच्छता करून दिवा प्रज्वलित करावा आणि आपल्या सहभागाची ऑनलाइन नोंद करावी, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
‘माझे घर, माझी स्वच्छता; माझा सहभाग, माझी जबाबदारी’ या भावनेतून प्रत्येक कुटुंबाने या उपक्रमात सहभागी होऊन स्वच्छ, सुंदर पिंपरी चिंचवडच्या निर्मितीत आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन पिंपरी चिंचवड महापालिकेने केले आहे.





