Home ताज्या बातम्या प्रभाग १६ मध्ये शिवसेनेचा दबदबा; रिपाई–भाजपच्या ताकदीने ‘अ’ गटात बाजी मारली

प्रभाग १६ मध्ये शिवसेनेचा दबदबा; रिपाई–भाजपच्या ताकदीने ‘अ’ गटात बाजी मारली

0

किवळे,दि.१६ जानेवारी २०२६(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक १६ मध्ये मतदारांनी स्पष्ट आणि वेगळा संदेश दिला आहे. शिवसेनेच्या तीन उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवत आपली पकड मजबूत केली, तर ‘अ’ गटात रिपब्लिकन पक्षाच्या ताकदीचा प्रत्यय देत भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणारे धर्मपाल तंतरपाळे यांनी थरारक विजय मिळवला. त्यामुळे प्रभाग १६ मध्ये एकूणच वेगळे आणि चर्चेचे राजकीय वातावरण निर्माण झाले आहे.
प्रभागातील ‘ब’, ‘क’ आणि ‘ड’ गटातून शिवसेनेचे ऐश्वर्या तरस, रेश्मा कातळे आणि नीलेश तरस यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली होती. आठव्या फेरीपर्यंत ही आघाडी अबाधित राहिली आणि जसजशी मतमोजणी पुढे गेली, तसतशी या तिघांची आघाडी वाढत गेली. अखेर चौदाव्या फेरीअखेर पाच ते सात हजार मतांच्या फरकाने या तिन्ही उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवत शिवसेनेचा झेंडा फडकावला.
विजयानंतर शिवसेना उमेदवारांच्या कुटुंबीयांमध्ये, विशेषतः महिलांमध्ये आनंदाश्रू पाहायला मिळाले. प्रभागातील बहुसंख्य मतदारांनी शिवसेनेच्या विकासात्मक भूमिकेला साथ दिल्याचे या निकालातून स्पष्ट झाले.
‘अ’ गटात थरार; रिपब्लिकन पक्षाच्या ताकदीचे प्रदर्शन
प्रभाग १६ च्या ‘अ’ गटात तब्बल १३ उमेदवार रिंगणात होते. खरी लढत शिवसेनेचे बाळासाहेब ओव्हाळ, राष्ट्रवादीच्या श्रेया तरस-गायकवाड आणि भाजपच्या चिन्हावर रिपाईचे उमेदवार धर्मपाल तंतरपाळे यांच्यात झाली. आठव्या फेरीपर्यंत ओव्हाळ यांची आघाडी सुरक्षित मानली जात होती आणि सुरुवातीला “शिवसेनेचा संपूर्ण पॅनल निवडून येणार” अशी चर्चा रंगली होती.
मात्र नवव्या फेरीपासून चित्र बदलले. धर्मपाल तंतरपाळे यांनी निर्णायक मुसंडी मारत ओव्हाळ यांची सुमारे एक हजार मतांची आघाडी मोडीत काढली आणि ४९४ मतांनी आघाडी घेतली. त्यानंतर ही आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवत ६७६ मतांनी दणदणीत विजय मिळवला. पराभव निश्चित मानून घरी गेलेले तंतरपाळे कार्यकर्त्याच्या फोननंतर पुन्हा मतमोजणी केंद्रात परतले आणि विजयानंतर गुलाल उधळत जल्लोष केला.
या विजयातून रिपब्लिकन पक्षाचे नेते दिलीप कडलक यांनी प्रभाग क्रमांक १६ मध्ये पुन्हा एकदा रिपाईची संघटनात्मक ताकद दाखवून दिली, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
वातावरणनिर्मितीचा परिणाम
या निकालाकडे केवळ पक्षीय विजय-पराभव म्हणून पाहता येणार नाही. गेल्या काही काळात *‘प्रजेचा विकास’*सारख्या माध्यमांतून विकासकामांवरील प्रश्न, स्थानिक असंतोष आणि जनतेचे मुद्दे सातत्याने मांडले गेले. सर्वच पक्षांतील पदाधिकारी आर्थिकदृष्ट्या सक्षम असतानाही, जनतेच्या प्रश्नांवर आधारित बातम्यांनी मतदारांचे लक्ष वेधले.
राजकीय जाणकारांच्या मते, या वातावरणनिर्मितीमुळेच प्रभाग १६ मध्ये निकालाचे गणित बदलले. तीन गटांत शिवसेनेचा भक्कम विजय आणि ‘अ’ गटात रिपाईच्या ताकदीवर मिळालेला भाजप चिन्हावरील विजय, यामुळे हा प्रभाग संतुलित पण संदेश देणारा ठरला आहे.
एकूणच, प्रभाग १६ चा निकाल हा
शिवसेनेचा संघटित विजय, रिपब्लिकन पक्षाची पुन्हा सिद्ध झालेली ताकद आणि जनतेच्या प्रश्नांवर आधारित मतदानाचा स्पष्ट संदेश देणारा ठरला आहे.

प्रजेचा विकास’मुळे राजकीय गणिते बदलली
प्रभाग १६ मधील निवडणूक ही केवळ पक्षीय ताकदीची नव्हे, तर सत्ता, पैसा आणि प्रभाव यांच्यातील संघर्षाची ठळक उदाहरण ठरली. सर्वच पक्षांतील बहुतांश पदाधिकारी धनदांडगे असल्याने प्रत्येकाने आपापल्या परीने सर्व प्रक्रिया, डावपेच आणि यंत्रणा वापरण्याचा प्रयत्न केला. प्रचार, व्यवस्थापन, शक्तिप्रदर्शन अशा सर्व पातळ्यांवर राजकीय ताकद पणाला लागली होती.
मात्र या सगळ्या गणितांवर ‘प्रजेचा विकास’च्या बातम्यांनी थेट गेम चेंज केला.
भाजपसह इतर पक्षांच्या सत्ताधारी व पदाधिकाऱ्यांवरील प्रश्न, विसंगती, विकासातील अपयश आणि जनतेतील असंतोष सातत्याने मांडल्याने मतदारांच्या मनात निर्माण झालेले ठाम मत हे निर्णायक ठरले. पैसा, प्रभाव आणि संघटनबळ असूनही जनतेच्या प्रश्नांवर बोट ठेवणाऱ्या बातम्यांनी वातावरण बदलले.
राजकीय विश्लेषकांच्या मते, जर ‘प्रजेचा विकास’ने वास्तव मांडणाऱ्या, प्रश्न विचारणाऱ्या आणि जनमत जागृत करणाऱ्या बातम्यांद्वारे वातावरण निर्माण केले नसते, तर या प्रभागात चित्र वेगळे असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
याच कारणामुळे काही ठिकाणी अपेक्षित नसलेले निकाल लागले, तर काही ठिकाणी विजय अत्यंत अटीतटीचा ठरला.
एकूणच, प्रभाग १६ च्या निवडणुकीत सत्ता आणि पैसा नव्हे, तर जनतेच्या प्रश्नांना आवाज देणाऱ्या बातम्यांनी निकालाची दिशा ठरवली, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

16 + eleven =