पिंपरी,दि.०७ जानेवारी २०२६(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष सर्व जाती-धर्मांना समान न्याय देत समाजाला एकत्र घेऊन चालणारा असून महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा पुढे नेण्याचे काम सातत्याने करीत असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केले.
पिंपरी गाव प्रभाग क्रमांक २१ मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. या वेळी प्रभाग क्रमांक २१ मधील उमेदवार संदीप वाघेरे, डब्बू आसवानी, प्रियंका कुदळे व निकिता कदम यांच्यासह विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती श्रीरंग शिंदे, पीसीएमटीचे माजी सभापती संतोष कुदळे, माजी नगरसेवक रंगनाथ कुदळे, हनुमंत नेवाळे, नाना काटे, रामआधार धारिया, विजय कापसे, शांती सेन, विजय लोखंडे, राणी कापसे आदी मान्यवर उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, “या शहराचे मला तब्बल २५ वर्षे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. या काळात मी कधीही जात-धर्माचा भेद न करता कार्यकर्त्यांना संधी दिली. सामान्य पानपट्टी चालविणारे अण्णा बनसोडे आज विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत. कविचंद भाट यांना महापौरपद देण्यात आले, तसेच आदिवासी समाजातील व्यक्तीलाही महापौरपदाची संधी देण्यात आली. हीच राष्ट्रवादी काँग्रेसची समावेशक राजकीय भूमिका आहे.”
दरम्यान, उमेदवार संदीप वाघेरे यांनी आपल्या भाषणात विरोधकांकडून अफवा व गैरसमज पसरवले जाऊ शकतात, मात्र नागरिकांनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन केले.
या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी पिंपरी गावातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपूर्ण पॅनेलला भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन मतदारांना केले.
Home ताज्या बातम्या फुले-शाहू-आंबेडकरांचे विचार पुढे नेणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे...





