किवळे-रावेत, दि. १८ जुलै २०२६ (प्रजेचा विकास प्रतिनिधी):किवळे-रावेत परिसरातील आदर्शनगर येथील सह्याद्री कॉलनीमध्ये मागील आठ दिवसांपासून ड्रेनेजच्या दूषित पाण्याची गळती होत असल्याने परिसरातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. व्हिजन अल्टिया सोसायटीच्या ड्रेनेज लाईनमधून सांडपाणी बाहेर पडत असून ते थेट सह्याद्री कॉलनीतील घरांच्या परिसरात साचत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. या प्रकारामुळे दुर्गंधी, अस्वच्छता आणि साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाल्याने नागरिकांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ड्रेनेज विभागाकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे.
रहिवासी विलास भिमा चव्हाण यांनी महापालिका आयुक्तांकडे दिलेल्या निवेदनात, गेल्या आठ दिवसांपासून ड्रेनेजमधील दूषित पाणी घराभोवती साचत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे नमूद केले आहे. परिसरात दुर्गंधी पसरली असून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
यासंदर्भात संबंधित बिल्डर तसेच साईट इंजिनिअर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, बिल्डर यांनी भ्रमणध्वनीला प्रतिसाद दिला नाही, तर साईट इंजिनिअरचा मोबाईल क्रमांक बंद असल्याने त्यांची भूमिका समजू शकली नाही.
नागरिकांनी महापालिकेने तातडीने घटनास्थळी पाहणी करून ड्रेनेज गळती कायमस्वरूपी थांबवावी आणि संबंधितांवर आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
तक्रारदार म्हणाले…
“गेल्या आठ दिवसांपासून आमच्या घराभोवती ड्रेनेजचे दूषित पाणी साचत आहे. दुर्गंधीमुळे घरात राहणेही कठीण झाले असून साथीच्या आजारांचा धोका वाढला आहे. महापालिकेने तातडीने पाहणी करून या समस्येचे कायमस्वरूपी निराकरण करावे.”
— विलास भिमा चव्हाण, तक्रारदार





