जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप
खेड,दि.३० डिसेंबर २०२५ (प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- तहसीलदार खेड यांच्या कथित मनमानी कारभाराविरोधात आणि जिल्हाधिकारी पुणे यांनी दिलेल्या स्पष्ट आदेशावर अद्याप कारवाई न झाल्याच्या निषेधार्थ पॅंथर दत्ताभाऊ गायकवाड यांनी हलगीनाद आंदोलन छेडले आहे.
दि. २७ जून २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे (कुळकायदा शाखा) यांच्याकडून तहसीलदार खेड यांना पत्र क्र. पी.टी.आय / कपि / १४८२ / २०२५ अन्वये संबंधित प्रकरणात तातडीने कार्यवाही करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले होते. मात्र या पत्रानंतरही आजतागायत कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचे निदर्शनास आल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयासारख्या वरिष्ठ शासकीय यंत्रणेच्या आदेशांकडे दुर्लक्ष होणे ही गंभीर बाब असून, यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. कारवाईच्या विलंबामुळे अन्यायग्रस्त नागरिकांना न्याय मिळण्यास अडथळा निर्माण होत असून सामान्य जनतेत तीव्र नाराजी पसरत असल्याचेही सांगण्यात आले.
यावेळी बोलताना पॅंथर दत्ताभाऊ गायकवाड यांनी संबंधित प्रकरणात तात्काळ, पारदर्शक आणि निष्पक्ष चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली. प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन त्वरित न्याय देण्याची भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा आंदोलनकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे.





