Home ताज्या बातम्या प्रभाग क्रमांक १६ : आघाड्यांची रेलचेल, मैत्रीपूर्ण लढतींचा गोंधळ आणि अपक्षांना उगवती...

प्रभाग क्रमांक १६ : आघाड्यांची रेलचेल, मैत्रीपूर्ण लढतींचा गोंधळ आणि अपक्षांना उगवती संधी

0

किवळे,दि.२८ डिसेंबर २०२५(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १६ (विकासनगर, किवळे, रावेत, मामुर्डी) मध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही बाजूंनी जोरदार तयारी सुरू असली, तरी प्रत्यक्ष मैदानात मात्र चित्र वेगळेच दिसत आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे महाविकास आघाडी पिंपरी-चिंचवड शहरात एकत्रितपणे निवडणूक लढवत नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्याचप्रमाणे महायुतीही एकसंध न राहता, घटक पक्ष स्वतंत्रपणे किंवा एकमेकांच्या विरोधातच रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. परिणामी, आघाड्यांचे झेंडे जरी एकमेकांच्या शेजारी दिसत असले, तरी प्रत्यक्षात प्रत्येक पक्ष “मैत्रीपूर्ण लढत” देण्याच्या तयारीत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
या मैत्रीपूर्ण लढतींचा सर्वात मोठा परिणाम मात्र थेट मतदारांवर होताना दिसत आहे. कोण कुणाचा उमेदवार आहे, कोणत्या पक्षाचा खरा पाठिंबा कुणाला आहे आणि निवडणुकीनंतर सत्ता समीकरणे कशी बदलतील—या सर्व प्रश्नांनी मतदार संभ्रमात सापडला आहे. “आघाडी म्हणून मत द्यायचे की व्यक्ती पाहून?” असा प्रश्न प्रभाग क्रमांक १६ मध्ये वारंवार ऐकायला मिळत आहे.
दरम्यान, गेल्या काही वर्षांतील अपूर्ण विकासकामे आणि विशेषतः कोरोना काळात माणसांनी माणसासाठी जगण्यासाठी केलेली धडपड आजही नागरिकांच्या स्मरणात आहे. त्या कठीण काळात पक्षभेद बाजूला ठेवून काम करणारे काही स्थानिक चेहरे नागरिकांच्या विश्वासास उतरले. त्यामुळेच मोठ्या पक्षांच्या अंतर्गत गोंधळाच्या पार्श्वभूमीवर अपक्ष उमेदवारांकडे नागरिकांचा कल वाढताना दिसत आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, जर महाविकास आघाडी आणि महायुतीतील पक्षांनी एकमेकांविरोधातच मैत्रीपूर्ण लढती दिल्या आणि मतदारांना स्पष्ट दिशा देण्यात अपयश आले, तर प्रभाग क्रमांक १६ मध्ये अपक्ष उमेदवार निवडून येण्याची दाट शक्यता आहे. मात्र दुसरीकडे, हा गोंधळच काही पक्षांकडून जाणीवपूर्वक निर्माण केला जात असून, संभ्रमात सापडलेला मतदार शेवटी पुन्हा पारंपरिक पक्षांनाच मतदान करेल, अशी जनभावनाही तयार होताना दिसत आहे.
एकूणच, प्रभाग क्रमांक १६ मधील यंदाची लढत ही केवळ महाविकास आघाडी विरुद्ध महायुती इतकी मर्यादित न राहता, गोंधळलेले आघाडी राजकारण, संभ्रमात टाकलेला मतदार आणि त्यातून उभारी घेणारे अपक्ष अशी बहुआयामी होण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

five + seven =