Home ताज्या बातम्या नगरसेवक म्हणजे मालक नाही, जनतेचा सेवक

नगरसेवक म्हणजे मालक नाही, जनतेचा सेवक

0

पिंपरी चिंचवड,दि.२८ जानेवारी २०२६ (प्रजेचा विकास संपादकीय):- नगरसेवक झालात म्हणजे जनतेचे मालक झालात असा गैरसमज अनेकदा सत्तेच्या खुर्चीवर बसताच निर्माण होतो. प्रत्यक्षात लोकांनी दिलेला कौल हा अधिकार नव्हे, तर जबाबदारी असते. मतदानातून जनतेने प्रतिनिधित्वासाठी दिलेली ही परवानगी असते राज करण्याची नव्हे, सेवा करण्याची.
नगरसेवक हा प्रभागातील प्रत्येक नागरिकाचा सेवक आहे. मत दिले किंवा न दिले, ओळखीचे असो वा विरोधक सर्वांशी समान आदराने वागणे ही लोकशाहीची पहिली अट आहे. दारात आलेल्या नागरिकाचे ऐकून घेणे, त्याच्या समस्येला प्राधान्य देणे आणि योग्य मार्गाने त्यावर तोडगा काढणे, हाच खरा लोकप्रतिनिधीचा धर्म.
प्रभागातील मूलभूत प्रश्न पाणी, रस्ते, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, वाहतूक हे घोषणांपेक्षा महत्त्वाचे आहेत. फलक, प्रसिद्धी आणि शक्तिप्रदर्शन यांपेक्षा नियमित कामकाज, पारदर्शक निर्णय आणि वेळेत कृती यावर जनतेचा विश्वास टिकतो. कार्यालये ही दालनं जनतेसाठी उघडी असावीत; भाषा सौम्य, वागणूक सुसंस्कृत आणि निर्णय निष्पक्ष असावेत.
सत्ता क्षणभंगुर आहे; सेवाभाव टिकाऊ आहे. आजची भूमिका उद्याच्या विश्वासाचा पाया घालते. नगरसेवकांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की जनतेने दिलेला मान हा त्यांच्या वर्तनावर अवलंबून असतो. अहंकाराने नाही, तर आदराने काम केल्यासच लोकशाही मजबूत होते.
शेवटी एवढेच नगरसेवक झालात म्हणजे जनतेचे मालक नाही झालात; जनतेचे सेवक झालात. त्या सेवेला प्राधान्य द्या, प्रभागाचा विकास करा, आणि लोकांचा विश्वास जपा.

निवडणूक जिंकताच काहींच्या डोक्यावर सत्ता चढते आणि आरसा धूसर होतो. पण लक्षात ठेवा.नगरसेवक झालात म्हणजे जनतेचे मालक नाही, तर जनतेचे सेवक झालात. लोकांनी मतदानातून दिलेली ही परवानगी राजेशाहीची नसून जबाबदारीची आहे. ती जपली नाही, तर जनतेचा कौल बदलायला वेळ लागत नाही.
नवनिर्वाचित नगरसेवकांनो, प्रभागात प्रजेचा विकास घारीप्रमाणे आकाशातून आणि कावळ्याप्रमाणे जमिनीवरून सर्वांवर नजर ठेवून आहे. कुठेही लफडे, गैरव्यवहार, नंगानाच झाला.तर तो लगेच उघड होणार आहे. आजच्या काळात सत्य लपवता येत नाही; फक्त उघड होण्याची वेळ ठरलेली नसते.
कार्यालयात बसून भाईगिरी दाखवणे, नागरिकांशी बोलताना औकातीच्या बाहेर जाणे, आवाज वाढवणे किंवा दादागिरी करणे ही सत्ता नाही, ही कमजोरी आहे. आदराने ऐकून घेणे, सभ्य भाषेत उत्तर देणे आणि काम करून दाखवणे हेच खरे नेतृत्व. ओळखीच्या आणि आपल्याच लोकांसाठीच कामे, उरलेल्यांसाठी दुर्लक्ष हा भेदभाव लोकशाहीला मान्य नाही.
फलकांपेक्षा फाईल्स हलवा. घोषणांपेक्षा रस्ते, पाणी, स्वच्छता, आरोग्य, शाळा या कामांत प्रगती दाखवा. पारदर्शकता ठेवा, वेळेत निर्णय घ्या, आणि चुकाल तर मान्य करा. कारण जनतेचा संयम मोठा असतो, पण विस्मरण नसते.
आज तुमच्या हातात अधिकार आहेत; उद्या जनतेच्या हातात निर्णय असतो. प्रमाणिक काम करा, नम्र राहा, आणि लक्षात ठेवा घारीची नजर आणि कावळ्याची खबरदारी चुकली, तर प्रजेचा विकास शांत बसणार नाही. लोकशाहीत सत्ता मिळवणे सोपे असते; विश्वास टिकवणे कठीण. जनतेच्या सेवेसाठी तत्पर सदैव जनतेच्या बाजूने ठाम विचार मांडणारे विचारपीठ आपला प्रजेचा विकास….

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

17 − 17 =

error: Content is protected !!
Exit mobile version