किवळे,दि.०८ जानेवारी २०२६(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- प्रभाग क्रमांक १६ किवळे–मामुर्डी परिसरात झपाट्याने वाढणाऱ्या खासगी बांधकामांमुळे स्थानिक नागरिकांवर तीव्र पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले असून, या पार्श्वभूमीवर नगरसेविका सौ. रेश्मा बापूजी कातळे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे लेखी निवेदन सादर करत नवीन बांधकाम प्रकल्पांना पाणी कनेक्शन देऊ नये अशी ठाम मागणी केली आहे.
प्रभाग १६ मध्ये मोठ्या प्रमाणावर खासगी बांधकामांना विना परवाना तसेच परवाना देऊन पाणी कनेक्शन दिले जात असल्यामुळे आधीपासून वास्तव्यास असलेल्या सोसायट्या व नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नसल्याची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. किवळे परिसरातून शहराच्या विविध भागांना पाणीपुरवठा होत असतानाच, याच भागात मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाई जाणवत आहे, ही बाब अत्यंत चिंताजनक असल्याचे नगरसेविका कातळे यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे.
स्थानिक नागरिकांकडून सातत्याने येणाऱ्या तक्रारी व सूचना लक्षात घेता, विद्यमान पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत नव्या बांधकामांना परवाना व पाणी कनेक्शन देऊ नये, तसेच या प्रकरणी तातडीने प्रशासकीय कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
नगरसेविका रेश्मा कातळे यांनी स्पष्ट केले की, नागरिकांचा पाणीहक्क धोक्यात येऊ नये यासाठी प्रशासनाने कठोर निर्णय घेणे आवश्यक आहे.



