रावेत, दि.१३ जानेवारी २०२६ ( प्रजेचा विकास न्यूज प्रतिनिधी):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक १६ हा सध्या राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. बाहेरून पाहता तिन्ही प्रमुख पक्षांची तयारी जोमात दिसत असली, तरी पडद्याआड चित्र वेगळंच असल्याचं बोललं जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काढलेल्या शक्तिप्रदर्शन रॅलीने परिसरात मोठा धुराळा उडवला. कार्यकर्त्यांची संख्या, नेत्यांची उपस्थिती आणि संघटनात्मक ताकद यामुळे राष्ट्रवादीने आपली ताकद दाखवून दिल्याचं स्थानिक नागरिकांमध्ये बोललं जात आहे.
याच्या तुलनेत भाजपची बाईक रॅली मात्र अपेक्षेपेक्षा फिकी ठरल्याची प्रतिक्रिया अनेक ठिकाणी उमटली. “मोठा पक्ष, मोठे दावे; पण प्रत्यक्ष मैदानात कार्यकर्त्यांचा जोश कुठे?” असा सवाल आता उघडपणे उपस्थित होत आहे.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे, भाजप हा प्रभागात सर्वात मोठा पक्ष असतानाही भाजपविरोधी जनमत का तयार होत आहे? हा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. दिलेले उमेदवार स्थानिक पातळीवर जनतेशी संवाद साधण्यात, प्रश्न समजून घेण्यात आणि विश्वास निर्माण करण्यात अपयशी ठरत असल्याची भावना मतदारांमध्ये दिसून येते.
दरम्यान, शिवसेनेची भूमिका या सगळ्यात वेगळी ठरत आहे. कोणतेही भव्य रॅली-शक्तिप्रदर्शन न करता, शिवसेनेचे उमेदवार थेट जनतेच्या प्रश्नांवर—वाहतूक कोंडी, पाणीपुरवठा, अंतर्गत रस्ते, स्वच्छता—यावर बोलताना दिसत आहेत. “आम्ही रॅली करून गर्दी वाढवणार नाही, तर प्रश्न सोडवण्यावर भर देणार” ही भूमिका अनेक नागरिकांना भावल्याचं चित्र आहे.
यामुळेच आज प्रभाग क्रमांक १६ मध्ये एक वेगळंच राजकीय गणित तयार होताना दिसत आहे. भाजपचे काही कार्यकर्ते आणि नेतेही उघडपणे शिवसेना किंवा राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे पाहू लागल्याची चर्चा आहे.
ही स्थिती भाजपसाठी चिंताजनक मानली जात असून, शेवटच्या टप्प्यात मतदार नेमका कोणता संदेश देणार, याकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलं आहे.



