किवळे-रावेत,दि.२७ डिसेंबर २०२५(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक–२०२६ चे रणांगण आता तापू लागले असले, तरी प्रभाग क्रमांक १६ ड (सर्वसाधारण पुरुष गट) मध्ये ही निवडणूक केवळ पक्षांची नव्हे, तर दबदबा, ओळख, ओळखीची ओळख आणि वरच्या आशीर्वादांची लढाई बनत चालली आहे.
संपूर्ण शहराचे लक्ष वेधणाऱ्या या प्रभागात उमेदवार तोडीसतोड असले, तरी जनतेचे प्रश्न मात्र अजूनही तोडीसतोड उत्तरांची वाट पाहत आहेत.राष्र्टवादी मध्ये दोन दावेदार पण बाजी मारणार कोण यावर पुढच लक्ष असे दक्ष वातारण निर्माण झाले आहे.
विद्यमान नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांचा प्रभागावर चांगलाच दबदबा असल्याचे सांगितले जाते. मागील पाच वर्षांत अनेक कामांचे उद्घाटन झाले, फलक लागले; मात्र काही प्रश्न “पुन्हा निवडून आलो की पाहू” या फोल्डरमध्येच अडकून पडल्याची चर्चा नागरिकांत रंगू लागली आहे.
दुसरीकडे, २०२० पासून निवडणुकीच्या तयारीत असलेले तीन नवे चेहरे जनसेवेच्या नावाखाली सक्रिय झाले आहेत. त्यात महालक्ष्मी कोल्हापूर दर्शन घडवणारे बापू कातळे सध्या जोरदार चर्चेत आहेत. दर्शन घडले, फोटो झाले; पण प्रभागातील पाणी, रस्ते, ड्रेनेजचे दर्शन कधी घडणार? असा सवाल मात्र नागरिक विचारू लागले आहेत.
भाजपात नव्याने प्रवेश केलेले, समीर लॉन्सचे मालक दीपक भोंडवे सामाजिक कार्याच्या जोरावर मैदानात उतरले असले, तरी सामाजिक काम आणि सार्वजनिक जबाबदारी यातला फरक निवडणुकीनंतरही लक्षात राहील ना? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
तर शिवसेना शिंदे गटाचे शहराध्यक्ष निलेश तरस हे प्रभागात ‘एकनाथ शिंदे’ म्हणून ओळख मिळवत आहेत. मात्र नाव मोठं असलं तरी स्थानिक प्रश्नांवर स्थानिक पातळीवर किती ठोस भूमिका घेतली? हे अजून मतदारांना उमगलेले नाही.
या चारही उमेदवारांवर महायुतीतील आमदार-खासदारांचे आशीर्वाद, मार्गदर्शन असल्याचे सांगितले जात आहे. पण विशेष म्हणजे, प्रभाग क्रमांक १६ मध्ये महायुतीच मैत्रीपूर्ण लढतीच्या नावाखाली एकमेकांविरोधात दंड थोपटून मैदानात उतरली आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून मोरेश्वर भोंडवे आणि बापू कातळे, भाजपाकडून दीपक भोंडवे, तर शिवसेना शिंदे गटाकडून निलेश तरस असा चौरंगी सामना पाहायला मिळणार आहे.
प्रभागात समस्या अनेक आहेत — रस्ते, पाणी, वाहतूक, ड्रेनेज, मूलभूत सुविधा. चारही उमेदवार प्रश्न सोडवण्यासाठी तत्पर असल्याचे सांगतात, पण निवडणूक जाहीर होईपर्यंत हे प्रश्न नेमके कुठे होते, असा खोचक सवाल जनतेतून उपस्थित होत आहे.
एकंदरीत, प्रभाग क्रमांक १६ मध्ये अतितटीची लढत निश्चित आहे. मात्र या लढतीत जिंकणार कोण? यापेक्षा निवडून आल्यानंतर खरंच काम करणारा कोण? हे पाहणे जनतेसाठी अधिक महत्त्वाचे ठरणार आहे.
कारण यावेळी मतदार फक्त झेंडा पाहणार नाही, तर कामाचा हिशोब मागणार, हे मात्र नक्की.



